चन्नी असे का म्हणाले?
आंतरराष्ट्रीय सीमेवरील ५० किमीच्या पट्ट्यात ‘बीएसएफ’ला अतिरिक्त अधिकार बहाल करणे, म्हणजे देशाच्या संघराज्य पद्धतीवर हल्ला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, त्यांनी हा तर्कहीन निर्णय तातडीने मागे घ्यावा,” असे पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी म्हणाले. थोडक्यात त्यांचे म्हणणे की, हा निर्णय म्हणजे केंद्र सरकारचा संघराज्यावर हल्ला आहे. पण, याच निर्णयाचे स्वागत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्र सरकारचा सीमा सुरक्षिततेसंदर्भातला निर्णय पटतो आणि चन्नी यांना निषेध करावासा वाटतो, हे असे का असेल? खरे तर घटनेनुसार सुरक्षिततेसंदर्भात सर्वोच्च निर्णय हा केंद्राचाच आहे. केंद्र सरकारला देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही करताना त्याबद्दल निषेध व्यक्त करणार्या चन्नी यांची भूमिकाच संशयास्पद वाटते. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी क्रूरपणे सत्ता बळकावली. तालिबान्यांना चीन आणि पाकिस्तानचे उघड समर्थन दिसते. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि देशाच्या समस्त सीमाभागात सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. सीमेच्या पार लढायला आमचे जवान सज्ज आहेत. पण, घुसखोरी करणारे तसेच देशांतर्गत देशविरोधी कारवाया करणार्यांना अडवणे गरजेचे आहे. मोदी राज्यात जनता सतर्क झाली आहे. पण, प्रशिक्षित ‘बीएसएफ’ जवान सीमाभागातील कारवायांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. हे सगळे चन्नी यांना माहिती नसेल का? मग त्यांचा विरोध कशाला आहे? त्यांच्यामागे बोलवता धनी कोण? खलिस्तानी कारवायांनी कधी काळी पंजाबने खूप काही सहन केले आहे. देशाच्या सीमा भागातील दशहतवादी, नक्षलवादी कारवायांनी परत डोके वर काढू नये, यासाठी केंद्र सरकार सुरक्षिततेमध्ये वाढ करत असेल, तर हा निर्णय कोणत्याही देशनिष्ठ व्यक्तीसाठी स्वागतार्ह आहे. मग चरणसिंग चन्नी या निर्णयाच्या विरोधात का? त्यांच्या विधानावर त्यांच्या दिल्लीच्या तख्ताच्या राजमाता, राजकुमार आणि राजकन्याही गप्प का? विचार करण्यासारखे आहे.