‘युपीएससी’-‘एमपीएससी’च्या परीक्षा उत्तीर्ण होणे, हे अनेकांचे स्वप्न असते. काही मोजकेच हे स्वप्न पूर्ण करू शकतात. पुण्याच्या मृणाली जोशीने हे स्वप्न वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पूर्ण केले. आता सामाजिक कर्तृत्वाच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात करणारी ही विद्यार्थिनीदुर्गा!
यश मिळाल्यावर हुरळून जाणारी जनता सभोवती असताना केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत राष्ट्रस्तरावर ३६ वा आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यावरसुद्धा ‘मला परीक्षेचा निकाल लागल्यावर शांत वाटले’ असे अत्यंत शांत-संयमी स्वरात सांगणारी मृणाली जोशी ही निराळीच! खडतर प्रवास जरी अनुभवास नसला, तरी जिद्द, अपयश पचवण्याची ताकद आणि इच्छाशक्ती या बळावर मृणालीने मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे.अभिनव इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण झालेल्या मृणालीने फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषयात पदवी संपादन केली. तसेच ती सध्या ‘पब्लिक अॅडमिस्ट्रेशन’ विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये ‘नेतृत्व विकास’चा (लीडरशिप) दोन वर्षांचा कोर्स केल्यामुळे तिला स्वत:मधील नेतृत्व गुण ओळखता आलेच, त्याचप्रमाणे या कोर्समुळे भारतातील अनेक राज्यांतील सामाजिक परिस्थिती तिने अगदी जवळून पाहिली. त्याकरिता ईशान्य भारत ते तामिळनाडूपर्यंत तिने प्रवास केला. केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात शिबिरांना न जाता, तिने डोळसपणे तेथील महिलांचे-स्थानिकांचे प्रश्न, प्रशासकीय कामकाज या सर्वांचा अभ्यास केला. या सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा तिचा मानस होता आणि यातूनच ‘सिव्हील सर्व्हिसेस’च्या परीक्षांची ती तयारी करू लागली.स्पर्धा परीक्षा देणारे अनेक असतात, लाखांमध्ये असतात, पण काही मोजकेच त्यामध्ये यशस्वी होतात. मृणाली ही त्यातील एक आहे. ‘युपीएससी’चा अभ्यास करण्यापूर्वी ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये मार्गदर्शन तिने घेतले, आई-वडिलांना तिने याची पूर्वकल्पना दिली. “ ‘युपीएससी’चा अभ्यास ही काही एक-दोन दिवसांत होणारी प्रक्रिया नसते. तिला काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. त्यामुळे वास्तविक गोष्टींचा विचार करूनच या प्रवासास सुरुवात करावी,” असे मृणाली सांगते. हजारो-लाखो रुपये शिकवणी-अभ्यासिकेवर खर्च करण्याच्या काळात मृणालीने स्वअध्ययनावर जास्त लक्ष दिले. ‘हार्ड स्टडी’ न करता ‘स्मार्ट स्टडी’वर तिने अधिक भर दिला. तिने प्रत्येक दिवसाचे आणि अभ्यासक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले. अभ्यासासह अन्य अवांतर वाचन आणि लेखनावर भर देण्याचेही तिने नियोजन केले. मुख्य म्हणजे ते नियोजन तिने अंमलात आणले.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात. मृणालीलासुद्धा पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत यश मिळाले नाही. पण, अपयशामुळे खचून न जाता अपयशाची कारणे तिने शोधून काढली. त्या चुका पुन्हा होणार नाही, याची तिने काळजी घेतली. सामाजिक माध्यमांसारखी प्रलोभने असतानाही मृणाली निश्चयाने या सर्वांपासून दूर राहिली. जिद्दीने अभ्यास करून तिने देशात गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक मिळवला. या यशाचे श्रेय ती तिच्या आई-वडिलांना आणि मार्गदर्शकांना कृतज्ञतेने देते.केवळ अभ्यास एके अभ्यास न करता मृणालीला लेखनाची आवड आहे. ती उत्तम कविता करतेच, तसेच ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या मासिकात लेखनही करते. तिला चित्रकलेचीही तितकीच आवड आहे. अभ्यासासह या कला नवीन ऊर्जा देणार्या ठरतात, असे तिचे मत आहे.प्रत्येकाचा एखादा आदर्श असतो किंवा आपण जीवनात कोणचे ना कोणाचे अनुकरण करत असतो. पण, याला मृणाली अपवाद आहे. ती अनुभव घेण्यावर भर देते. एकच एक आदर्श असण्यावर तिचा विश्वास नाही. प्रत्येकातील चांगले गुण हे घेण्यासारखे असतात. अनेक लोकांकडून विविध गोष्टी शिकण्यास मिळतात, असे मृणाली नमूद करते.शालेय स्तरापासून वक्तृत्व, लेखन आणि चित्रकला यामध्ये बक्षिसे मिळवणारी मृणाली फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी परीक्षेत प्रथम आली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘वुमन अॅण्ड डेव्हल्पमेंट’ कोर्समध्ये तिने ‘आऊटस्टॅण्डिंग’ म्हणजेच ‘ओ’ ग्रेड मिळवली. सध्या ती स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेच, तसेच ती ‘युपीएससी’च्या प्रवासासंदर्भात एका संकेतस्थळाची निर्मिती करते आहे, जे भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.मृणाली ‘युपीएससी’ परीक्षेत मिळालेल्या यशानंतरही स्वत:ला कर्तृत्ववान समजत नाही. संस्कृतध्ये आदर्श विद्यार्थी कसा असतो, हे सांगणारे
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया ।
सब्रह्मचारिभ्यः पादं पादं कालक्रमेण च ॥
हे सुभाषित आहे. मृणाली या सुभाषिताचेच उत्तम उदाहरण आहे.
आजच्या काळात थोडक्या अपयशाने खचून जाणारे विद्यार्थी आहेत किंवा यश मिळाल्यावर हुरळून जाणारा वर्ग, यांच्यासमोर मृणालीसारखी संयमी विद्यार्थिनीदुर्गा आदर्श ठरू शकते.
- वसुमती करंदीकर