कोलकाता - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज सेवनाबद्दल अटक केल्यानंतर पश्चिम बंगालच्या काॅंग्रेसी नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. आर्यनच्या अटकेनंतर ममता दीदी 'मौन' का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
अभिनेता शाहरूख खान हा पश्चिम बंगालचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. अनेक प्रसंगी बॅनर्जींनी शाहरुखचा आपला ‘भाऊ’ म्हणून उल्लेख केला आहे. अशावेळी शाहरुखचा मुलगा तुरुंगात असताना ममता बॅनर्जी शांत का ? असा सवाल पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, "पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्या सर्व मुद्द्यांवर सामान्यत: जोरदार आवाज उठवतात, त्या आता शांत का आहेत ?"
चौधरी म्हणाले, “आमच्या मुख्यमंत्री प्रत्येक विषयावर बोलतात. परंतु बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेच्या मुद्द्यावर त्यांनी मौन पाळले आहे. शाहरुख खान पश्चिम बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ममता बॅनर्जी त्याला आपला भाऊ म्हणतात. मग त्या या विषयावर गप्प का आहे? असे दिसते की त्या भाजपमधील आपल्या मित्रांना संतुष्ट करण्यासाठी हतबल आहेत. ”