आयसीसी टी - २० चषक : अक्षर पटेल 'आउट', लॉर्ड शार्दुल ठाकूर 'ईन'

13 Oct 2021 18:37:10

Shardul thakur_1 &nb
 
 
 
नवी दिल्ली : आयसीसी टी-२० चषक स्पर्धेसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना संघात अचानक एक मोठा बदल करण्यात आला. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी अंतिम संघात असलेल्या अक्षर पटेल ऐवजी मुंबईच्या लॉर्ड शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांकडून प्रश्न विचारले जात आहेत. तर, दुसरीकडे शार्दुलची गेल्या काही महिन्यातील कामगिरी पाहता अनेकांनी या निवडीचे समर्थन केले आहे.
 
 
 
 
 
शार्दुल ठाकूरचा समावेश का झाला?
 
गेल्या महिन्यामध्ये आयसीसी टी-२० चषक स्पर्धेसाठी भारताने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. यावेळी शार्दुल राखीव खेळाडूंमध्ये होता तर अक्षर हा मुख्य संघात होता. परंतु, आयपीएल २०२१च्या दुसऱ्या भगत त्याने चांगली कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने १५ सामन्यात १८ विकेट्स काढल्या आहेत. तसेच, चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरतो आहे. तसेच, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने दाखवलेल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आता फक्त गोलंदाज म्हणून नाहीतर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पहिले जात आहे.
 
 
शार्दुलच्या निवडीचे दुसरे कारण म्हणजे, हार्दिक पंड्याची कामगिरी. हार्दिकने आयपीएल २०२१मध्ये एकदाही गोलंदाजी केलेली नाही. तसेच, त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघात त्याची निवड केल्याने अनेकांनी या निवडीवर शंका उपस्थित केली होती. आता शार्दुलचा संघात समावेश केल्याने तो हार्दिकचा पर्याय म्हणून संघात असेल. अक्षर पटेलची कामगिरीदेखील साजेशी झालेली नाही. त्यामुळे निवड समितीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या पात्रता फेरी लढती १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ आपला पहिला सामना खेळणार असून पाकिस्तानसोबत भिडत होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी दुसरा सामना होणार आहे. पहिले दोन्ही सामने दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. तिसरा सामना अबुधाबी येथे होणार असून ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध हा सामना होणार आहे. त्यानंतरच्या दोन लढती दुबई आणि शाहजहा येथे होणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने सांगितले की, भारतीय संघाला केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून चाहत्यांचा पाठिंबा मिळतो. या जर्सीच्या माध्यमातून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0