पंजाब सीमा भागांमध्ये जबरदस्ती धर्मांतरण

13 Oct 2021 17:48:35

punjab_1  H x W
नवी दिल्ली : कॉंग्रेस शासित पंजाबमध्ये वाढत्या इसाई धर्मांतरणाच्या प्रकरणांमुळे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची झोप उडाली आहे. अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी दावा केला आहे की, ख्रिश्चन मिशनरी राज्याच्या सीमावर्ती भागात जबरदस्तीने धर्मांतरासाठी मोहीम राबवत आहेत. या भागांमध्ये लोकांना लालूच दाखवून किंवा फसवून त्यांचे धर्म परिवर्तन केले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा धर्मांतरणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
 
 
ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी म्हंटले आहे की, "ख्रिश्चन मिशनरी गेल्या काही वर्षांपासून सीमावर्ती भागात जबरदस्तीने धर्मांतरासाठी मोहीम राबवत आहेत. भोळ्या लोकांना फसवून किंवा आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले जात आहे. आम्हाला या संदर्भात अनेक अहवाल प्राप्त झाले आहेत. पंजाबमधील शीख, विशेषत: दलित शीखांचे धर्मांतर पाहता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
अकाल तख्तचे जत्थेदार म्हणाले की, "धर्म हा अध्यात्माचा विषय आहे. जबरदस्तीने धर्मांतर आणि फसवणूक कधीही समर्थनार्थ असू शकत नाही. सर्व शीखांनी एसजीपीसीला धर्मांतरणाविरोधात मोहीम राबविण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे." ख्रिश्चन धर्मांतरण हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगत ते म्हणाले की, एसजीपीसीची मोहीम देशभर चालवण्याची गरज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0