‘एअर इंडिया’ची मालकी टाटांकडे गेल्याचे वृत्त निराधार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान वाहतूक कंपनीची मालकी टाटा समुहाकडे गेल्याचे वृत्त निराधार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ‘एअर इंडिया’च्या निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे, मात्र ‘एअर इंडिया’ची मालकी टाटा समुहाकडे केल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळपासून प्रसारित झाले होते. मात्र, ‘एअर इंडिया’ निर्गुंतवणुक प्रकरणात खासगी कंपन्यांकडून लावण्यात आलेल्या बोलींनी केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचा दावा करणारे वृत्त चुकीचे आहेत. केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतर त्याविषयी प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल, असे केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.
तोट्यात आणि कर्जाच्या बोज्यात असणाऱ्या ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान वाहतूक कंपनीचे निर्गुंतवणुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे.