विष्णु सवरा यांची मासिक श्रद्धांजली सभा संपन्न
कल्याण : सवरा यांच्या जाण्याने संघ परिवारातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाचे नुकसान झाले, असे वाटत आहे. आयुष्य छोटे पण अर्थपूर्ण जगावे. सवरा यांनीदेखील त्यांच्या आयुष्यात चांगले कार्य केले. सवरा यांच्या केवळ सोबत असण्याने भाजप आणि संघ परिवारातील सदस्यांना काम करण्याची चेतना मिळत होती. सवरा यांचे कार्य पुढे नेले तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
हिंदू सेवा संघ आणि छत्रपती शिक्षण मंडळ यांच्यातर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. ही सभा कल्याण पश्चिमेतील अभिनव विद्यामंदीरात शनिवारी घेण्यात आली. विष्णु सवरा यांनी छत्रपती शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी मुंबई तरूण भारतने सवरा यांच्यावर प्रकाशित केलेल्या ‘वनवासींचा आधारवड - मा. विष्णु सवरा स्मृती विशेषांका’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, छत्रपती शिक्षण मंडळाचे माजी कार्यवाह भास्करराव मराठे, छत्रपती शिक्षण मंडळांचे उपाध्यक्ष मनोहर ठाकूर-देसाई, हिंदू सेवा संघ उपाध्यक्ष अण्णा वाणी, मुंबई तरूण भारतचे व्यवसाय प्रतिनिधी सुधीर लवांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, श्वास आणि नाव यामधील अंतर म्हणजे जीवन असते. व्यक्ती जन्मला येते तेव्हा तिच्याकडे श्वास असतो पण नाव नसते आणि व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्याकडे नाव असते पण श्वास नसतो. मरणानंतर ही नाव आदराने घेतले पाहिजे. सवरा यांचे कार्यदेखील तसेच होते. म्हणून एक महिन्यानंतर ही त्यांच्या श्रद्धांजली सभा होत आहे. सवरा हे मंत्री पदावर गेले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर होते. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाली. दिवंगत चिंतामण वनगा आणि विष्णु सवरा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जिंकली. जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष भाजपचा झाला. या कामामध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा होता. दुसऱ्या निवडणूकीत वनगा नव्हते आणि सवरा यांची तब्येत ठीक नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. सवरा यांच्या केवळ सोबत असण्याने भाजप आणि संघ परिवारातील सदस्यांना काम करण्याची चेतना मिळत होती. सर्वच व्यक्तींच्यया मासिक श्रद्धांजली सभा होतातच असे नाही. कोणत्याही व्यक्तींवर मुंबई तरूण भारतने विशेषांक प्रकाशित केला तसा विशेषांकही निघत नाही. सवरा यांनी अलौकिक कार्य करून ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची आपल्याला दखल घ्यावी लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांचे ११०० सामुदायिक विवाह करून गिनीज बुकात हिंदू सेवा संघाचे नाव घेऊन जाण्याचा विष्णु सवरा यांनी संकल्प केला होता. नंतर मात्र, गिनीज बुकात अन्य एका संस्थेने ३३०० सामुदायिक विवाह घडवून आणल्याची नोंद असल्याची माहिती मिळाली. अर्थात, आता त्यापेक्षा अधिक सामुदायिक विवाह घडवून आणल्यास गिनीज बुकात हिंदू सेवा संघाचे नाव कोरले जाईल व तीच सवरा यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या संघाचे अध्यक्ष सवरा होते. आता त्यांचे सुपुत्र आहेत. हा संकल्प अपूर्ण राहिला आहे. हा संकल्प सिद्धीस नेल्यास हिंदू सेवा संघाचे नाव गिनीज बुकात जाईल. तरूण पिढीलाही त्यांच्या कार्यातून ख:या अर्थाने प्रेरणा मिळेल त्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
अण्णा वाणी म्हणाले की, सवरा हे एक अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्त्व होते. सामुदायिक विवाहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. सवरा यांनी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे संस्थेकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सवरा यांच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. श्रद्धांजली सभेला उपस्थित असलेल्या रा. स्व. संघाचे सदस्य आणि व्यासपीठावरील मान्यवरांची भाषणो यावेळी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगधंरा पाटील यांनी केले. युगधंरा पाटील यांनी आभार मानले.
विष्णू सवरा यांच्यावरील स्मृती विशेषांकाचे कौतुक
दै. मुंबई तरूण भारतने विष्णू सवरा यांच्या जीवनावर ‘वनवासींचा आधारवड-मा. विष्णु सवरा स्मृती विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकातून सवरा यांचे कार्य तरूणांना समजणार आहे. सवरा यांच्या कार्यातून तरु णांना प्रेरणा मिळणार आहे. दै. मुंबई तरूण भारतने नावाप्रमाणे तरूणांना प्रेरणा देणारे काम केले आहे. या विशेषांकाबद्दल पाटील यांनी दै. मुंबई तरूण भारतचे कौतुक केले.