दिवेआगर-कोळथरे किनाऱ्यावर सापडली कासवाची घरटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

turtle _1  H x


घरट्यात मिळाली १२३ अंडी

मुंबई (अक्षय मांडवकर) - समुद्री कासव विणीच्या यंदाच्या हंगामातील कासवांची घरटी रत्नागिरीतील कोळथरे आणि रायगडमधील दिवेआगरच्या किनाऱ्यावर सापडली आहेत. या घरट्यांमध्ये कासवमित्रांना प्रत्येकी १०५ आणि १२३ अंडी आढळून आली आहेत. काही दिवसांपूर्वी हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर कासवाचे घरटे आढळले होते. येत्या काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग किनाऱ्यावरही समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतील. 
 
 


राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. २००३ साली चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने सागरी कासवांच्या संवर्धन मोहिमेला सुरूवात केली. आता संवधर्नाचे हे काम वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने पाहिले जाते. गेल्यावर्षी सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २३३ घरटी आढळली होती.
 
 
 
यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे २५ डिसेंबर रोजी हरिहरेश्वर किनाऱ्यावर सापडले होते. यामध्ये १३८ अंडी मिळाली होती. आज रायगडमधील दिवेआगरच्या किनाऱ्यावर कासवाचे घरटे मिळाल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. यामध्ये १२३ अंडी सापडली असून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हॅचरीत हलविल्याचे त्यांनी सांगितले. तर सोमवारी दापोलीतील कोळथरे किनाऱ्यावर कासवाचे घरटे आढळून आले असून त्यामध्ये १०५ अंडी आढळल्याची माहिती दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील हे पहिलेच घरटे असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मारळ, दिवेआगर आणि हरिहरेश्वर चार किनाऱ्यांवर कासवाची एकूण १५ घरटी आढळून आली होती. तर रत्नागिरीच्या १३ किनाऱ्यांवर कासवाची १५९ घरटी सापडली होती.
 
अंडी व घरटय़ांची जपणूक
 
समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडय़ाप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@