आ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला स्थानिकांचाही पाठींबा
नवी मुंबई: प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या आंदोलनात दि.बा.पाटील साहेब महनीय नेते होते. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचा भक्कम आधार स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
१९८४ साली झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन देशभर गाजले. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन मिळावी, यासाठी उभारलेल्या आंदोलनात दिबा स्वतः जखमी झाले होते. त्यामुळे आज येथील शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना सुबत्ता आली आहे. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्यात दिबांनी अथक परिश्रम केले. पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या त्या प्रयत्नांमुळेच आज अनेक अशिक्षित शेतकऱ्यांची मुले उच्च विद्याविभूषित झाली आहेत.
पनवेल - उरण - नवी मुंबई या क्षेत्रात दिबांचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे येथे होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देणे उचित ठरणार आहे, असे मत अनेक स्थानिकांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. समस्त पनवेल- उरण मधील शेतकऱ्यांचीसुद्धा हीच इच्छा असल्याचे वारे वाहताना दिसत आहेत.