नाशिक : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ संशोधक, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. यावर्षी हे संमेलन नाशिक येथे होणार असून कोविडच्या काळामध्ये सर्व नियम आणि अटींचे पालन करून हे पार पाडण्याचा उद्देश आहे. यावेळी साहित्यिक भारत सासणे यांचेदेखील नाव चर्चेत होते. मात्र, साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चालल्या बैठकीत जयंत नारळीकर यांच्या नावावर एक मत झाल्याची माहिती देण्यात आली.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. बाल वाचकांमध्ये विज्ञान कथांची गोडी निर्माण करणारा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. 'अंतराळातील भस्मासूर', 'अंतराळ आणि विज्ञान', 'गणितातील गमती जमती' अशी अनेक बालसाहित्य त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय त्यांना 'पद्मभूषण' (१९६५), 'पद्मविभूषण' (२००४) आणि 'महाराष्ट्र भूषण' (२०१०) अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.