सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीत भाजपची मुसंडी
मुंबई - ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची मोठी पडझड झाल्याची कबुलीच आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांनी कोकणात ग्रामपंचायतींच्या निकालांवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याचे केलेले विधान खरे ठरले आहे. सिंधुदुर्गात आपली सत्ता राखण्यात राणेंना यश मिळाले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदानामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये काही प्रदेशांमध्ये शिवसेनेची पडझड झाली आहे. ही बाब खुद्द शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून मान्य करण्यात आली आहे. "विदर्भ-मराठवाड्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे. कोकणात शिवसेनाच आहे. पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल", असे राऊतांनी म्हटले आहे.
कोकणात शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या बालेकिल्यात आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नामधून कमळ फुलले. कोकणात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचाय, असे नितेश राणे यांनी म्हटले. “सिंधुदुर्गातील ७० पैकी ५७ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आम्ही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव या ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. या निकालावरून राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे, हे स्पष्ट होते. कोकणात आता शिवसेना नावालाही उरणार नाही” असे नितेश राणे म्हणाले.