आपण स्वतः विश्वासघात करून अपघाताने मुख्यमंत्री झालेले आहात - भातखळकर

19 Jan 2021 12:26:24

atul bhatkhalkar _1 



मुख्यमंत्र्यांनी लगावला होता टोला

मुंबई - भाजपचे आमदार आणि मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकांचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आपण स्वत: विश्वासघात करुन अपघाताने मुख्यमंत्री झालेले आहात, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. काल मुंबई वाहतूक विभागाच्या कार्यक्रमातील भाषणादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता. 
 
 
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. काल वाहतूक विभागाच्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केले होते. राज्याच्या गाडीचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे. त्यामुळे कार आणि सरकार दोन्ही चांगले चालले आहे. केवळ काही खड्डे आडवे येतात. मात्र, घाबरायचे काही कारण नाही, असे ते म्हणाले होते. शिवाय मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे, असे ते म्हणाले. यावर आपण स्वत: भाजपचा विश्वासघात करुन अपघाताने मुख्यमंत्री झालेले आहात, असे टि्व्ट आमदार भातखळकर यांनी केले आहे. 
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृतवाहिनेला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, उद्धव ठाकरे जेव्हा गाडी चालवतात तेव्हा ट्रॅफिक थांबलेले असते. त्यामुळे त्यांना गाडी सहज चालवता येते. मात्र, सरकार चालवत असताना ट्रॅफिक थांबलेले नसते. ते सुरुच असते. त्यामुळे जनता योग्य उत्तर देत आहे. 

Powered By Sangraha 9.0