मुंबई : पालघरमधील गडचिंचले साधू हत्त्याकांड प्रकरणी शनिवारी ८९ जणांना जामीन मंजूर झाला. ठाणे न्यायालयात ही सुनावणी होती. विशेष न्यायाधीश एस. बी. बहालकर यांच्या न्यायालयाने या आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात २५१ जणांना अटक करण्यात आली होती, तर या अगोदर १०५ जणांना जामीन मंजूर झाले आहेत. शनिवारी पुन्हा ८९ जणांना जामीन मंजूर झाला असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण १९४ जणांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणात तब्बल २५१ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आज ठाणे जिल्हा विशेष मॉब लिचिंग न्यायालयाने आणखी ८९ आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यापूर्वी याच न्यायालयाने तब्बल ८६ जणांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या १९४ वर पोहोचली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये १२ आरोपी हे अल्पवयीन होते. तर न्यायालयाने यापूर्वीच हत्येत प्रमुख भूमिका असल्याचा ठपका ठेवत ३६ आरोपींचा जमीन अर्ज फेटाळला आहे.