मुंबई : सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली आहे. एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणी ही कारवाई एनआयए कडून करण्यात आली. परिषदेचे धागेदोरे नक्षलवाद्यापर्यंत गुंतलेले असल्याचा आरोप आहे.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद भरविण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. परिषद घडवून आणण्यात फुटीरतावादी आणि माओवादी गटांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याच्याशी संबंधित दोन टप्प्यात अटकसत्र २०१८ साली पुणे पोलिसांनी राबविले होते. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास 'एनआयए'ने ताब्यात घेतला.
याच तपासादरम्यान कबीर कला मंचाशी संबंधित सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याविषयीचे धागेदोरे एनआयए च्या हाती लागल्याचे समजते. त्यावरून एनआयए ने सोमवारी सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली. कबीर कला मंचावर यापूर्वीही प्रतिबंधित कारवायांत सहभागी असल्याचे आरोप झाले आहेत. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळातदेखील नक्षल गुन्ह्यात कबीर कला मंचाशी संबंधित कार्यकर्त्यांना अटक झाली होती.