मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दाऊदच्या हस्तकाचा मातोश्री हे निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही परदेशातून धमकीचे फोन आले असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. नुकतिच खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण केंद्रात भेट झाली होती. नेत्यांना येत असलेले धमकीचे फोन हे या भेटीचे कारण आहे का, याबद्दल आता शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘टीव्ही 9’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
रविवारी मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान उडवून देण्याचीही धमकी आली होती. चार वेळा दुबईतून हा फोन करण्यात आला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकी आल्याचे बोलले जात आहे .मात्र, फोन करणाऱ्याने नेमकी कशाबद्दल धमकी दिली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन येत असलेल्या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.