मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' वर निनावी फोन आला आल्याने खळबळ माजली.मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मात्र यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
ट्विट करत नितेश राणे म्हणतात, "शेवटी महाराष्ट्रच्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला.डायरेक्ट दाऊद ची धमकी आली.आता तरी घरातून बाहेर निघा.मुख्यमंत्री साहेब!!" असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला. यापूर्वीही मुख्यमंत्री कोरोना काळात घरातून काम करत असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या निनावी फोननंतर मातोश्रीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मातोश्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवासस्थानाबाहेर पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली असून अजून पोलीस कुमक बोलवण्यात येणार आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. आता हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे. जर कोणी तसा खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.