मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वादाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. यातच संजय राऊत यांनी शनिवारी एका चॅनेलशी बोलताना कंगनाबद्दल अपशब्द उच्चारले.त्यामुळे कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करून पुन्हा संजय राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला. मात्र, यावर संजय राऊत यांनी पुन्हा फेसबुकवरून पोस्ट करत माफीची मागणी करणाऱ्यांना "माझी ताकद काय आहे, हे त्या लोकांना विचारा, ज्यांच्याजवळ १०५ आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसले आहेत....जय महाराष्ट्र!" असे म्हणत संजय राऊत यांनी टीकाकारांना लक्ष केले. मात्र त्यांच्या या विधानाचा विरोधी पक्ष भाजपने समाचार घेतला.
याबाबत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊतांना सुनावले. ते म्हणतात, "१०५ आमदार असूनही विरोधी पक्षात असलेल्या ना माझी ताकद विचारा. संजय राऊत..खरं आहे..तुमच्या विश्वासघात आणि लाचारीशी १०५ आमदार असलेला विरोधी पक्ष नाही लढू शकत. तिथे मुरलेला कोडगेपणा लागतो." असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
कंगनाने संजय राऊतांना सुनावले
''संजय जी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले... तुम्ही एक मंत्री आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहितीये याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,'' असे कंगनाने व्हिडीओत म्हटले. ''मी तुमच्यावर टीका करते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय.. तुमचे लोक मला ठार मारू अशा धमक्या देत आहेत. मी सांगते तुम्ही माराच... या देशातील मातीचं कर्ज रक्त सांडूनच निभावता येईल. भेटूया ९ सप्टेंबरला. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं आव्हान कंगनाने दिले.