मुंबई : रिया चक्रवर्तीला कुठल्याही क्षणी अटक होण्याची चिन्हे आहेत. मुंबई पोलीसांवर दबाव टाकून रियाला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपने वेळोवेळी लावला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "राज्यात कोरोनाचा भयंकर कहर सुरू आहे. रिया चक्रवर्ती ला वाचवण्यासाठी सरकारने जेवढी मेहनत घेतली तेवढी महाराष्ट्राला कोरोना पासून वाचवण्यासाठी केली असती तर चित्र वेगळे असते...", अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्तीला एनसीबी कार्यालयाकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आता तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रियाच्या वकीलांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तिच्या अटकेचे भाकीत व्यक्त केले जात आहे. रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी त्यांची अशील अटकेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच अग्रीम जामीनासाठी अर्जही आपण करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.