मुंबईची तुंबई झाली! शिवसेना-बीएमसी काय करतेय?
मुंबई : पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि पालिका आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना काय करत आहे, असा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. कंगना रणौत आणि माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यांशी वादंग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर या कामांकडे लक्ष दिले असते तर आज सामान्य जनतेला या नाहक त्रासाला बळी पडावे लागले नसते, असा टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई महापालिकेची रखडलेली कामे, नालेसफाई आणि तुंबलेले रस्ते ही कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता भाजपतर्फे विचारण्यात येत आहे. मुंबईत बुधवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले.
ऑफिस गाठायला उशीर झाल्याने अनेकांना अर्ध्यातूनच घरी परतावे लागले. बसमध्ये रोजच्या प्रमाणे गर्दी तर होती, मात्र, बसही अर्ध्यापाण्यात तरंगू लागते की काय, अशी परिस्थिती दिवसभर होती. इतकी वर्षे पालिकेची सत्ता उपभोगत असणाऱ्या शिवसेनेने काय केले, असा सवाल आता विचारला जात आहे.