नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्म्यहत्या प्रकरण आणि बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन याबाबत महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. असे असताना आता यावर अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. “बॉलीवूडने अनेक कलाकारांना ड्रग्सची सवय लावली आहे. इथे अनेकांच्या हत्या होतात, व्यसने लावली जातात. तर, महिला कलाकारांचा अपमानही केला जातो. या सगळ्या प्रकरणावर मुंबई पोलीस शांत का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी विधानसभा परिसरात याबाबतीत निशेष दर्शवला. पायाल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “मुंबईमधील फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांवर अन्याय होतात. अनुराग कश्यपवर पायल घोषने जे गैरवर्तनाचे आरोप केले त्याप्रकरणी इंडस्ट्री शांत कशी काय आहे? मुंबई पोलीस शांतपणे हे सर्व पाहत आहेत. त्यांच्याविरोधात काहीच कारवाई का करत नाही?” असे म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांना सवाल केला आहे.