आयटीबीपी जवान सांभाळतायत या केंद्राची कमान
नवी दिल्ली : जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे करून घरी पाठवण्यात भारताने विक्रम केला असतानाच आता जगातील सर्वात मोठ्या कोरोना सेंटरमधून कौतूकास्पद बाबी पुढे येत आहेत. आयटीबीपी जवान या केंद्राची देखभाल करत आहेत, सुदैवाने इथे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही किंवा अद्याप एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला महामारीची बाधा झालेली नाही... कशी काळजी घेतली जाते वाचा सविस्तर...
एक मोठी वातानुकूलीत छत असलेली जागा. रांगेत रचण्यात आलेल्या हजारो खाटा. त्यावर विश्रांती घेत असलेले शेकडो कोरोना रुग्ण. जिथपर्यंत तुमची नजर पोहोचेल, तिथपर्यंत कोरोना रुग्ण. आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण यांच्यात बारीक पारदर्शक प्लास्टीक आवरण. तसेच निगेटीव्ह चाचणी आलेले रुग्ण शिस्तबद्ध पद्धतीत रांगेत उभे, कारण त्यांना आता घरी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे, असे प्रार्थमिक स्वरुप असलेले हे कोरोना केंद्र.
या विभागाची देखरेख करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मिश्रा यांना एक रुग्ण विचारतो. मी घरी जाण्यासाठी आता कॅब बुक करू का ?, त्यावर अधिकारी उत्तर देतात. इथे सर्वकाही व्यवस्थेनुसारच होईल. तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला आम्हीच घरी पोहोचवू. दिल्लीपासून दूर काही अंतरावर राधा स्वामी सत्संग न्यास कॅम्पसमध्ये जगातील सर्वात मोठे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. निमलष्करी आयटीबीपी जवान याची कमान सांभाळत आहेत.
इथे आणखी गरज भासल्यास १० हजार खाटा नव्याने मांडण्याचीही व्यवस्था आहे. सध्या दोन हजार कोरोना रुग्णांवर एकाच छताखाली उपचार सुरू आहेत. महिलांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहे. इथे दाखल झालेल्या महिलांनी व्यवस्था आणि सुरक्षिततेबद्दल जवानांचे कौतूक केले व आभारही मानले आहेत. एक शिस्तबद्ध असलेल्या व्यवस्थेमुळे दिलासाही मिळाला आहे. तसेच आरोग्य कर्मचारी वेळेत उपचार व चौकशी करत असल्याने सुरक्षितही वाटत आहे.
इथले आरोग्य कर्मचारी आमच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवतात. त्यांच्याशी चांगले जमले आहे. त्यामुळे उपचार घेत असताना आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत आहे. आल्यापासून प्रकृतीही सुधारणा होत. आहे. घरापासून दूर असलो तरीही घरासारखीच काळजी इथे घेतली जात असल्याचे अनुभव रुग्ण सांगत आहेत. भरती झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर चिंता किंवा तणाव दिसत नाही. काहीजण विरंगुळा म्हणून पुस्तक वाचत आहेत. काही जण विश्रांती घेत आहेत. स्वयंशिस्त इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच नव्हे तर रुग्णांमध्येही शिस्तप्रिय वागणूक दिसते.
कोरोना रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजीही इथे घेतली जात आहे. कोरोना रुग्णांच्या मानसिक आरोग्य सृदृढ रहावे यासाठी विशेषज्ञांची टीमही तैनात आहे. योगासन, मेडीटेशन आणि प्रत्येक रुग्णाची वेगळी काळजी घेतली जाते. रुग्ण कोरोना झाल्याची चिंतेने त्रस्त असतात. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्वतःला कोरोना झाल्याची चिंता त्यांना सतावत असते. त्यासाठी मनाने सृदृढ बनवण्याची जबाबदारी इथल्या विशेषज्ञांनी घेतली आहे.
अधिकारी ब्रिजेश म्हणतात, "महामारीचा काळ बऱ्याचदा आपल्यासाठी चिंता वाढवणार आहे. मात्र, आमचे इथले पथक अधिकाऱ्यांचे निर्देशांचे पालन करतात. अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी इथल्या ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतात. जेवणाची व्यवस्था राधा स्वामी सत्संग न्यासार्फे केला जात आहे. रुग्णांना दिवसातून तीनवेळा काढा, दोनवेळा चहा, गरम पाणी आणि दोनवेळचे जेवण मोफत दिले जात आहे."
रुग्ण दाखल झाल्यानंतर मेडीकल किट दिले जाते. त्यात मास्क, सॅनिटायझर आणि चवनप्राश आदी गोष्टी दिल्या जातात. लहान मुले आणि अतिदक्षता घ्यावी लागणाऱ्या रुग्णांचे जेवण डॉक्टर ठरवतात. भारतात कोरोना रुग्णांची दररोजची आकडेवारी १ लाख रुग्ण प्रतिदिन इतकी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जुलै महिन्यात सरदार वल्लभ भाई पटेल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यात दिल्ली सरकार, दिल्ली नगर नियम राधा स्वामी सत्संग आमि कित्येक सरकारी संस्थांचा सहभाग आहे. आयटीबीपी जवान केंद्रातील इतर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
एकूण पाच हजार रुग्ण भरती झाले आहेत. विना लक्षण असलेल्या किंवा साधी लक्षणे आढळलेल्या रुग्णांनाही इथे भरती करण्यात आले आहे. अतिदक्षता विभाग, प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्ध असलेल्या एकूण १८०० खाटांवर रुग्ण आहेत. दोनशे खाटा ऑक्सिजन व्यवस्था असलेल्या आहेत. इथे १७ दिवसांच्या तान्ह्या मुलापासून ते ७८ वर्षांच्या कोरोना रुग्णांपर्यंत सर्वजण एका छताखाली उपाचार घेत आहेत. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयातर्फे उभारण्यात आलेले हे कोरोना उपचार केंद्र सर्वांसाठी उदाहरण ठरू शकते. गरज भासल्यास याची व्यवस्था आणखी वाढवण्यात येणार आहे.