नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज केल्याची माहिती ट्विटरवर दिली. उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेला कुठलेही स्थान नाही, असेही त्यांनी म्हटले. शिवाजी महाराज आमचे नायक आहेत. यानंतर याबद्दल आता विविध स्तरातून प्रतिक्रीया येत आहेत.
कुतूब मिनार जैन मंदिरे तोडून त्यावर उभारण्यात आला आणि त्याचा तुम्ही उत्सव कसला करता, असा प्रश्न लेखक तारीक फतेह यांनी विचारला आहे.संग्रहालयाचे नाव बदलल्यानंतर एका टिव्ही चॅनलवर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात मूळचे पाकिस्तानी वरिष्ठ पत्रकार, लेखक तारिख फतेह जे सध्या कॅनडाहून सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी परखड मत मांडले. जे लोक भारताला लुटण्यासाठी आले होते, त्यांना आपण बादशाहचे स्थान देतो, त्यांच्याबद्दलचा उत्सव साजरा करतो.
ते म्हणाले, "बाबर ना भारतात जन्मला ना भारतात मृत पावला. त्याने केवळ समाजात विष पेरण्याचे काम केले. हजारो लाखो लोकांची हत्या केली. त्याला आपण हिंदूस्तानाचा बादशाह मानू शकत नाहीत. ताजमहल हिंदुस्तानी नागरीकांनी तयार केला होता. जगात असा कुठलाही देश नाही ज्याने हल्ला करणाऱ्याचा सन्मान केला. भारतच असा देश आहे जिथे असे प्रकार चालतात."
ते पुढे म्हणतात, मुघलांनी शिख, हिंदूंवर अत्याचार केले. दिल्लीत तयार करण्यात आलेला कुतूब मीनार २६ जैन मंदिरांना तोडून उभारण्यात आला आहे. लोक त्या गोष्टीचा उत्सव करतात. आपल्याला या गोष्टीबाबत आत्मसन्मान जागृत करायला हवा. भारताला सुल्तानांनी उध्वस्त केले. लोकांना ठार केले मात्र, याऊलट भारतात मुगल-ए-आझम हा चित्रपट तयार करण्यात आला.
मुघल हा शब्दही दूषित आहे. हा मंगोलशी संलग्न आहे. ज्याला समरकंदमध्ये काही सापडले नाही तर तैमूरची आपत्ये भारतात आली. भारताला लुटून नेले. यापूर्वीही केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनीही कुतूब मिनारच्या इतिहासावर भाष्य केले होते. तारीक फतेह हे पाकिस्तानचे सरकार आणि पंतप्रधान इमरान खान यांचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या ते कॅनडा येथे राहतात.