महानगरपालिकेने बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्तेचे नुकसान केल्याचा कंगनाचा दावा!
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने बीएमसीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
महानगरपालिकेने बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्तेचे नुकसान केल्याचा दावा कंगनाने केला. यावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. आता जर महानगरपालिका कंगनाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध करू शकली नाही, तर त्यांना कंगनाला नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपये द्यावे लागतील.
मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर सुरु झालेला वाद कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईपर्यंत पोहोचला. कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मंगळवारी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम ३५४(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण, तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने पालिकेकडून बुधवारी सकाळी तिथे बांधकाम पडण्यास सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या कार्यालयात १२ अनधिकृत बांधकामे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. त्याला विरोध करत कंगनाने अॅड. रिझवान सिद्दीकीमार्फत हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली.