मुंबई : मुख्यमंत्र्यांना आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे , असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. यावेळी कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला?, असा सवालही चंद्रकांतदादा पाटलांनी उपस्थित केला.
“विरोधी पक्ष राजकारण करतंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. मग कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना! सुशांत सिंहच्या प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी जर योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास एजन्सीला काहीच करावे लागले नसते. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे”, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क लावल्यामुळे कदाचित त्यांना विरोधी पक्ष राजकारण करत आहे, असे वाटत असेल. पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल.सुशांत सिंह प्रकरणात केंद्राच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत जी कारवाईकेली आहे तर त्याला राजकारण नाही, तर प्रशासकीय कार्यपद्धती म्हणतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'आम्ही जनहितासाठी काही मागणी केली तर आम्ही राजकारण करतोय ?'
पुढे ते म्हणतात, राज्यात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय सोयीसुविधांची मोठी कमतरता आहे. शेतकरी गेल्या ९ महिन्यांपासून अनेक मागण्या करत आहेत. मराठा समाजाच्या हक्कांचे संरक्षण हे राज्य सरकार करू शकलं नाही. आम्ही जर जनहितार्थ कोणत्याही मागण्या केल्या तर आम्ही राजकारण करतोय? म्हणजे मुख्यमंत्री जी तुम्ही जे करत आहात, उदा. लोकांचे ऑफिस तोडणे, सतत अधिकायांच्या बदल्या करणे, सेवानिवृत्त सैनिकांना मारहाण करणान्यांना जामीन देणे, हे सर्व राजकारण नाही आणि आम्ही जनहितासाठी योग्य त्या मागण्या केल्या तर ते राजकरण झालं! असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.