ठाणे : सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेले मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अविनाश जाधव यांनी ठाण्यातील परिचिकांच्या समर्थनात राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. ठाण्यातील परिचिकांना कोरोनावर उपचार करत असताना योग्य मानधन मिळत नसल्याने जाधव यांनी हे आंदोलन पुकारले होते.
आंदोलन करत असतानाच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. जाधव यांना सुरुवातीला पोलीस कोठडीही त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. गेल्या आठवड्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. जाधव यांना नोटीस बजावल्यानंतर अनेक मनसे नेत्यांनीही सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप ठाकरे सरकारवर केला होता. मनसेने ठाण्यात ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने केली होती.