मुंबई : दोन दिवस मुंबईला पावसाने झोडपून काढल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची याबद्दल एक प्रतिक्रीया आली आहे. मुंबईतील पूरपरिस्थिती हा वातावरणातील बदल आहे, असा दावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मुंबईत पूरस्थिती आली, असा विरोधकांचा दावा हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले. 'या नवीन बदलांना स्वीकारण्यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे मला कुठल्याही राजकारणात पडायचे नाही', अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबईत उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुंबईतील पूरपरिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. ४८ तासांत ५०० मीमी इतका पाऊस मुंबईत कोसळला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई आणि पालिकेची यंत्रणा मुंबईतील पावसाळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरली या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता हा वातावरण बदल आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.