नवी दिल्ली : आयपीएल २०२०ची घोषणा झाल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये एक उत्साह निर्माण झाला होता. मात्र, त्यांनतर आयपीएलचे आयोजक चायना कंपनी विवो असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीयांकडून याचा विरोध होत आहे. अखिल भारतीय व्यापारी संघटनेने पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आयपीएल आयोजनास मनाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आतातरी विवो कंपनीचे नाव आयपीएलकडून मागे घेण्यात येते का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
संघटनेने लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘विवोचे प्रायोजकत्व कायम ठेवून स्पर्धा घेणे म्हणजे सरकारने घेतलेल्या धोरणाशी विसंगती ठरणार आहे. एकीकडे चीनने भारतीय सीमेवर आक्रमण केलेले असताना दुसरीकडे बीसीसीआयचा निर्णय सरकारच्या धोरणाशी विसंगत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन यासारख्या मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा स्थितीत दुबईत सामने आयोजित करण्याची व त्यातही विवोचे प्रायोजकत्व घेण्याची बीसीसीआयची भूमिका दुर्दैवी आहे. पैशासाठी बीसीसीआय किती स्वार्थी झाली आहे, हेच यातून दिसून येते.’ अशी टीका केली आहे.
गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षात भारतीय सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची मोहीम खुद्द अखिल भारतीय व्यापारी संघटनेने हाती घेतलेली आहे. केंद्र सरकारनेही अनेक चिनी कंपन्यांच्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. पण, विवो ही चायनिज मोबाईल कंपनी आयपीएल स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही हा करार रद्द करावा अशी अनेकांनी मागणी करण्यात येत होती. पण, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आणि करारातील अटीशर्थी लक्षात घेऊन विवो कंपनीकडे स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतला.