मुंबई : गणपतीसाठी मुंबई, पुण्याहून आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडथळे येत आहेत. ई पास हा त्यातील सगळ्यात मोठा अडथळा ठरला आहे. ई पाससाठी अर्ज केल्यानंतरही तो मिळत नाहीये मात्र दलालांच्या मार्फत मात्र सहज पास मिळत आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. अशातच ई भूमिपूजनाचा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलारांनी ई-पासच्या मुद्द्यावरून टीकेची झोड उठवली आहे.
राम मंदिराचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करा, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केली होती. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी ठाकरेंना टोला हाणला आहे. 'ई- भूमीपुजन' करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप 'ई पास' देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा ! चाकरमान्यांच्या प्रवासाबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. हे सगळं कधी करणार,' असा सवाल शेलार यांनी केला आहे. 'कोकणी माणसाच्या संयमाचा अंत पाहू नका,' असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच त्यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. याबाबत ट्विट करत माहिती देताना ते म्हणाले, कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा कोणताही निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने त्यांचे प्रचंड हाल सुरु असल्याने १४ दिवस कोरंटाईन व्हायचे ?आता अवघे २ दिवसच प्रवास करता येणार ? आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात पास द्या किंवा अन्य व्यवस्था करा.