रत्नागिरी : 'निसर्ग' चक्रीवादळात कोलमडलेली आंजर्ले गावातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा तब्बल महिनाभर बंद आहे. परिणामी नव्या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या डिजिटल शिक्षण पद्धतीपासून या गावातील विद्यार्थी वंचित आहेत. शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाईन निकाल, प्रवेश, तासिका सारंकाही ऑनलाईन भरत आहे, मुंबई पुण्याहून आलेले चाकरमानी वर्क फ्रॉम होम करत आहेत, निसर्ग चक्रीवादळात खंडीत झालेला विजपुरवठा काही आठवड्यांपूर्वी पूर्ववत झाला आहे, मात्र, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेकांची तारांबळ उडत आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीने कोलमंडलेली मोबाईल आणि इंटरनेट सेवा 3 जूनपासून ठप्पच आहे. रत्नागिरीतील आंजर्ले येथील कौमुदी जोशी हिने याबद्दलची तक्रार थेट राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे केली होती. याबाबत आयोगाने पाठवलेल्या पत्रानंतरही इंटरनेट सेवा बंदच आहे. त्यामुळे वेळेत कार्यवाही न झाल्यास रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स बजावण्यात येईल, असा इशारा आयोगाने दिला होता.