धुळे : कोरोना काळात अवाजवी परीक्षा शुल्क आकारणी सरकारने रद्द करावी या मागणीसाठी गेलेल्या अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ दिलीच नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्याचा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली पोलीसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. परिक्षा शुल्क रद्द करावे, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अशी वागणूक दिल्याने राज्यभरातून या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.
आपल्या न्याय आणि हक्कांची मागणी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना एखाद्या गुंडांप्रमाणे वागणूक देण्यात आल्याचे व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे. धुळ्यातील विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा प्रकार चुकीचा आहेच, परंतू पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन प्रश्न ऐकून घेतले असते तर असा प्रकार घडलाच नसता, या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.