मुंबई : गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचा संघर्ष समिती यांनी म्हाडावर चार सप्टेंबर रोजी धडक मोर्चा देण्याचा इशारा दिलेला आहे. पत्रा चाळ रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे आपल्या हक्काची जागा सोडून मुंबईबाहेर राहात आहेत. म्हाडाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही केले नाही असा या रहिवाशांचा आक्षेप आहे. म्हाडाच्या या वर्तणुकीचा निषेध म्हणून हा मोर्चा निघतो आहे.
गेले अनेक वर्ष हा गृहनिर्माण प्रकल्प रखडलेला आहे. अनेक रहिवाशी आपली हक्काची जागा सोडून मुंबई बाहेर राहायला गेले आहेत पण हा प्रकल्प अजून काही पूर्ण होत नाही. म्हाडाच्या असमर्थतेमुळे ६७२ कुटुंबे आज कॉरोणा च्या परिस्थितीत आपले घर गमावून बाहेर आसरा शोधत आहेत. अनेक रहिवाशी करोना काळात नोकरी गमावल्यामुळे राहत्या जागेचे भाडे देऊ शकत नाही आणि त्यांच्या जागेचा प्रश्न अतिशय बिकट ठरला आहे. या पार्श्वभूमी वर हे सगळे रहिवासी चार सप्टेंबरला म्हाडाच्या बांद्रा स्थित कार्यालयावर मोर्चा घेऊन येणार आहेत.
रहिवासी म्हणतात जेव्हा बिल्डरने ही जागा घेतली आणि पुनर्विकास करण्याची तयारी दर्शवली तेव्हा एक करार झाला होता. त्यात स्पष्ट म्हटले होते की बिल्डर हा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करू शकला नाही तर ती जबाबदारी म्हाडाची असेल. आता बिल्डरने २०१६ पासून आम्हाला भाडे दिले नाही आणि म्हाडा पण काही करत नाही, आमची कुटुंब वाऱ्यावर आली आहेत असे पत्रा चाळ समिती सदस्य म्हणाले.