कोरोना महामारी काळात मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी सुब्रमण्यम स्वामींचे आवाहन!
मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतील डबेवाल्यांचा रोजगार बंद झाला आहे; त्यांना उपासमारीपासून वाचवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी महाराष्ट्र सरकार आणि भाजपला केले.
मुंबईत नोकरी करणाऱ्या लाखो लोकांना ‘डबेवाल्यां’मुळे नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी घरचे जेवण वेळेवर मिळते. यासाठी जगभरात डबेवाल्यांची बिनचूक सेवा प्रसिद्ध आहे. स्वामी यांनी डबेवाल्यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारतातील डबेवाल्यांची सेवा ही तिच्या अचूकतेमुळे विकसित देशातही ‘आश्चर्य’ श्रेणीत गणली जाते.
दरम्यान, ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत मुंबईतील खासगी कार्यालये मोजक्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुरू झाली आहेत. पण लोकल सुरू झाल्या नसल्याने डबेवाल्यांचा रोजगार सुरू होऊ शकला नाही. लोकल केव्हा सुरू होणार हे निश्चित नसल्याने डबेवाल्यांचा रोजगार केव्हा सुरू होणार, हेही अनिश्चित आहे. टाळेबंदीच्या आधी सुमारे पाच हजार डबेवाले रोज दोन लाख ग्राहकांचे डबे त्यांच्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी बिनचूक पोहचवत होते.
कोरोनाकाळातही सत्याच्या बाजूने आणि समाजभान राखून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेक विषय लावून धरले होते. सुशांत प्रकरणातही त्यांनी धाडसाने लढणाऱ्या कंगना राणावतची बाजू लावून धरत, या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांनतर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दाही ते अतिशय गंभीरपणे हाताळत असून, त्यांनी आत मुंबईच्या डबेवाल्यांची समस्यादेखील महाराष्ट्र सरकारच्या नजरेस आणून दिली आहे.