जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी!

21 Aug 2020 15:48:39

Anant Karmuse_1 &nbs


पीडित अनंत करमुसे यांची विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे मागणी!

ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माझ्यावर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी घोडबंदर रोड येथील नागरिक अनंत करमुसे यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही केली आहे.


राज्यात लॉकडाऊन सुरू असताना ५ एप्रिल रोजी मला घोडबंदर रोड येथील माझ्या घरातून नेण्यात आले. त्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलिस सुरक्षा रक्षक व गुंडांचा सहभाग होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात आव्हाडांसमोर मला बेदम मारहाण करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरू असताना, मंत्री आव्हाड यांच्याकडून पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मारहाण झालेले नागरिक अनंत करमुसे यांनी केली आहे. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची ठाण्यात आज भेट घेऊन श्री. करमुसे यांनी निवेदन दिले. तसेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. या वेळी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, सुजय पत्की, अॅड. अनिरुद्ध गानू यांची उपस्थिती होती.




बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यासाठी अनंत करमुसे यांना त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ह्यांचा बंगल्यावर नेले होते. तिथे १५-२० व्यक्तींनी करमुसेंची मारहाण केली. संबंधित पोलीस कर्मचारी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांचे सुरक्षारक्षक असल्याचे म्हटले गेले आहे. इतका गंभीर गुन्हा घडून पाच महिने झाले तरीही कोणतीही ठोस कारवाई राज्य सरकारकडून झालेली नाही. राज्याचे मंत्री आणि पोलीस यांच्यावर थेट आरोप असल्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी तपास सीबीआयमार्फत करण्याची गरज आहे.
- ऍड. अनिरुद्ध गानू,
( अनंत करमुसेंचे वकील)









Powered By Sangraha 9.0