भाजपच्या 'अविश्वास'मुळे गेहलोत सरकार अडचणीत

13 Aug 2020 19:21:57

gehlot_1  H x W


जयपूर :
जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.



भाजपाचे राजस्थान विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, काँग्रेस टाके लावून कपडे शिवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचे कापड फाटले आहे, आता सरकारही लवकरच कोसळेल. तर भाजपचे राजस्थानमधील प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, हे सरकार आपसातील विरोधाभासामुळेच कोसळेल. हे लोक भाजपावर आरोप करत आहेत. पण यांच्या अंतर्गत वादांशी भाजपचे काहीही देणेघेणे नाही. काहीही कारण नसताना काँग्रेस आपल्या अपयशाचं खापर काँग्रेस भाजपावर फोडते आहे. असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे.




भाजपाने आज राजस्थानमधील आमदारांची बैठक घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेसुद्धा सहभागी झाल्या होत्या. तसेच केंद्रीय नेतृत्वाकडून प्रतिनिधीने या बैठकीत उपस्थिती लावली होती. राज्यपालांच्या आदेशानंतर राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनात केवळ कोरोना संकट आणि लॉकडाऊन तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.यादरम्यान, भाजपाने अविश्वास प्रस्ताव आणल्यास चर्चेनंतर गहलोत सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.
Powered By Sangraha 9.0