मुंबई : भाजपला शेतकऱ्यांबद्दल यांना कळवळा नाही, हे राजकीय आंदोलन आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा आरोप यांनी केला होता. मात्र, ज्या क्षणी स्वतःच्या आमदारकीसाठी राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठीची तलवार म्यान केली त्याच क्षणी शेतकरी व दूध उत्पादक यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलाय असा पलटवार भाजपचे नेते व विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजू शेट्टींवर केला आहे.
दरम्यान , राज्यात दूध उत्पादकांना सध्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर १५ ते २० रुपयांचा दर मिळत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या स्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, तसेच दूध पावडरीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह मित्र पक्षांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या क्षणी स्वतःच्या आमदारकीसाठी राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठीची तलवार म्यान केली त्याच क्षणी शेतकरी व दूध उत्पादक यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलाय. देवेंद्र फडणवीस सरकारने अनुदान दिलं होतं त्याचा आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारला विसर पडलाय. भाजप शेतकरी व दूध उत्पादकांना न्याय देईल ! असा विश्वास ही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
काय म्हणाले होते राजू शेट्टी ?
'भाजपची केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही, भाजप आणि सहयोगी पक्षांचे हे राजकीय आंदोलन, हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा, आमचं आंदोलन हे राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील होतं, दूध पावडर आयात बंदीची मागणी यांनी केंद्राकडे करावी. शेतकऱ्यांबद्दल यांना कळवळा नाही, हे राजकीय आंदोलन आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला होता.