आघाडी सरकारचे अपयश आक्रमकतेने मांडा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

27 Jul 2020 17:01:29


dgs_1  H x W: 0 
 
 
मुंबई : राज्यातील सरकारचे अपयश कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे जनतेपुढे मांडले पाहिजे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, “लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्यात सहभाग घेतला. आता या पुढील काळातही कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून जनतेची मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग होईल तसेच विलगिकरण केंद्रे सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रुग्णांची सेवा अधिकाधिक पद्धतीने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे.”
 
 
“फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये नवी मुंबईत झालेल्या अधिवेशनात पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या आंदोलनामुळे सरकारला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाचा विचार करणे भाग पडले. या पुढील काळात दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत नेणेही आवश्यक आहे. आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन उत्तर द्यावे.” असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
 
 
प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी आगामी काळात पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे केलेल्या दुर्लक्षा बद्दल आघाडी सरकारचा निषेध करणारा ठराव प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला. किसान मोर्चाचे प्रमुख डॉ. अनिल बोंडे , माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0