जयपूर : राजस्थान काँग्रेस सरकार अडचणीत आल्यानंतर दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर जहरी टीका केली आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायटल यांना कमी वयातच खूप काही मिळाले. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ते अकार्यक्षम आहेत, हे मला आधीपासून माहिती होते, असा घणाघात पायलट यांच्यावर गहलोत यांनी केला.
राजस्थानात सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसमधून त्यांना परत बोलवण्याचा प्रयत्न होत असताना गहलोत मात्र, दररोज त्यांच्यावर टीका करत आहेत. गहलोत म्हणाले , आम्ही पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असे राज्य असावे जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहिती होते. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही त्यांना कायम सन्मान दिला होता.
"आता हा काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता. मात्र तेव्हा आम्ही हा प्रकार सर्वांसमोर आणला. सचिन पायलट यांची काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. मोठमोठे कॉ़र्पोरेट त्यांना फंडिंग करत आहेत. तसेच भाजपाकडूनही फंडिंग केली जात आहे. मात्र आम्ही या सर्व् कारस्थानाची पोलखोल केली." असा आरोप गहलोत यांनी केला आहे. गहलोत यांची ही तळमळ पाहता सत्ता हातातून नक्की जाणार असल्याची खात्री त्यांना झाली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे.