मुंबई : "सचिन पायलट यांच्या काँग्रेस पक्षातील गच्छंतीमुळे मी दुःखी आहे. एका हुशार आणि सर्वोत्तम अशा व्यक्तीवर अशी वेळ आली. पक्ष सोडून जाण्यापेक्षा सोबत राहून अधिक प्रभावीपणे काम करायला हवे होते," अशी खंत काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केली.
माजी खासदार प्रिया दत्त यांनीही सचिन पायलट यांच्या जाण्याने चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, "आणखी एक मित्र पक्ष सोडून गेला. सचिन आणि ज्योतिरादित्य हे माझे चांगले मित्र आहेत. अनपेक्षितपणे त्यांना पक्ष सोडावा लागला. महत्वकांशी असणे हे वाईट नाही. त्यांनी पक्षाच्या वाईट काळात खूप खडतर काम केले आहे."
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त होताना सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्य यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही. मात्र, काँग्रेस आणि पक्ष नेतृत्वाबद्दलच्या नाराजीचा दर्प दोघांच्या वक्तव्यातून येतो. दोघांनीही उघडपणे पायलट यांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केल्याने पक्षातील साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.