कोरोना आटोक्यात आल्यावर परीक्षा घेण्याची तयारी : उदय सामंत
मुंबई : कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर असल्याने तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. इतर राज्यांशीही चर्चा केली जाणार आहे. विद्यापीठ परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने वाट पाहणार अशीही भूमिका सरकारने घेतली आहे. दुपारी १ वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ठाकरे सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असेही उदय सामंत यांनी विचारले आहे. तसेच कोरोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याचा घेण्याची तयारी आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.