नवी दिल्ली : “कोरोनाचे संकट हे गेल्या १०० वर्षात आलेले सर्वात मोठे आरोग्य आणि आर्थिक संकट आहे. असे असले तरीही आता आर्थिक सुधारणा दिसू लागल्या आहेत.” असा विश्वास भारतीय रिझर्व बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. ते सातव्या एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. तसेच या कोरोना संकटामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रिझर्व बँकेकडून चाललेल्या प्रयत्नांचीही माहिती त्यांनी दिली.
शक्तीकांत दास पुढे म्हणाले की, “कोरोनाशी सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. या संघर्षमय काळामध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणेमध्ये सरप्लस लिक्विडीटी राखण्यासाठी जोर दिला जात आहे. कोरोना संकटाच्या आधीच आरबीआयने काही महत्वाची पावले उचलली आहेत. व्याजदरात मोठी कपात केली असून, आर्थिक वाढीची गती वाढविण्यासाठी अधिक पावले उचलण्याची तयारी आहे.”
“रिझर्व्ह बँकेचे पहिले प्राधान्य देशाच्या विकासालाच आहे. तसेच आर्थिक स्थिरताही तेवढीच महत्त्वाची आहे. कोरोनामुळे एनपीएमध्ये वाढ होणार आहे आणि भांडवलातही घट होण्याची शक्यता आहे. लॉकडाउननंतर हळूहळू निर्बंध उठवले जात असल्याने त्याचे चांगले परिणाम आर्थिक घडामोडींवर दिसत आहेत. संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनीही उत्तम काम केले आहे,” असे ते पुढे म्हणाले.