योगगुरु रामदेव बाबा यांचा आरोप
हरिद्वार : योग गुरु बाबा रामदेव यांनी 'पतंजलि'च्या 'कोरोनिल' औषधावरून उठलेल्या वादावर मोठा आरोप केला आहे. ड्रग्ज माफिया आणि मल्टीनॅशनल कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आमच्याबद्दल अपप्रचार केला, स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार असे लोक स्वदेशीविरोधात वातावरण तयार करत आहेत. श्र्वासारी आणि कोरोनिलवर देशभरात कुठेही बंदी नाही. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांशी या संदर्भात चर्चा केली आहेत. देशभरात ही औषधे मिळू शकणार आहेत.
रामदेव बाबा यांनी पतंजलि आयुर्वेदतर्फे २३ जून रोजी केलेल्या घोषणेत कोरोनावर इलाज होणारी कोरोनिल आणि श्वासारी ही दोन औषधे शोधल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाच तासानंतर केंद्रातील आयुष मंत्रालयातर्फए याबद्दल माहिती मिळाली नसल्याचे म्हटले होते. याबद्दल संपूर्ण चाचण्या झाल्यावरच याचे प्रमोशन करता येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व विवादांना रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली.
माझ्या धर्मावर आणि जातीवर प्रश्न विचारण्यात आले !
रामदेव बाबा म्हणाले, ''माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. पतंजलिने कुठलीही परवानगी घेतली नाही. कुठलेही नियम पाळले नाहीत. काहींनी तर माझ्या सन्यासी जीवनावर आणि जाती-धर्मावर प्रश्न विचारले. ज्या प्रकारे कुठल्या दहशतवाद्याविरोधात गुन्हे दाखल होतात, तसे माझ्याविरोधात गुन्हे दाखल झाले. मला तुरुंगात पाठवण्याची स्वप्ने अनेकांनी पाहिली. तशी स्वप्ने पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मी गेली ३५ वर्षे या क्षेत्रात काम करत आलो आहे."
ते म्हणाले, ''प्रश्न विचारणाऱ्यांचे मनसुबे धुळीत मिळाले आहेत. आयुष मंत्रालयाने आमच्या प्रयत्नांचे कौतूक केले आहे. कोरोना महामारीशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल चांगले पाऊल उचलल्याबद्दल आमचे स्वागत केले आहे. मी मानतो पतंजलि जे काम करते, त्याची प्रशंसा करू नकाच परंतू अपप्रचार करणे थांबवा, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विदेशी कंपन्यांच्या गुलामीतून बाहेर या."
भाषेच्या गुलामीतून बाहेर आलोच नाही!
देश इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर आला. मात्र, इस्ट इंडिया कंपन्यासारख्या शेकडो विदेशी कंपन्यांच्या गुलामीतून देश कधी बाहेर येऊच शकला नाही. याच गुलामीमुळे स्वदेशी वस्तू, आयुर्वेद आणि इतर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवण्यास आपण कमी पडतो, असे ते म्हणाले.
आयुष मंत्रालयाकडे सोपवला अहवाल
कोरोना महामारी आणि तिच्या लक्षणांवर प्रभाव टाकणाऱ्या कोरोनिलचा संशोधन अहवाल पतंजलिने आयुष मंत्रालयाकडे सोपवला आहे. क्लीनिकल ट्रायलचा अहवाल आम्ही नव्हे तर मेडिकल एक्सपर्टतर्फे बनवण्यात आला आहे. १० पेक्षा जास्त आजारांशी लढण्याऱ्या औषधांच्या चाचणीत आम्ही तिसऱ्या टप्प्यांपर्यंत पोहोचलो आहे.
कोरोनिलवर उठवण्यात आलेल्या प्रश्नांचीही रामदेव बाबा यांनी उत्तरे दिली. “आमच्याकडे आयुर्वेदावर अभ्यास आणि संशोधन करणारे एकूण पाचशे ज्येष्ठ संशोधक आहेत. आचार्य बाळकृष्ण यांच्या नेतृत्वात अहोरात्र सेवा बजावत आहेत. आम्ही कोरोनावर संशोधनाचा अहवाल ठेवला तर याबद्दल वादळ उठले. ड्रग्ज माफियांना स्वदेशी औषधांबद्दल आक्षेप वाटू लागला. संशोधन करणाऱ्याचे सर्वाधिकार काय त्यांच्याकडेच आहेत का ? आम्ही सर्व मार्गदर्शक तत्व आणि प्रोटोकॉल पाळून संशोधन पूर्ण केले आहे.
बाबा रामदेव यांनी औषधे दाखवत म्हणाले, माझ्याकडे जी तीन औषधे दिसत आहेत. त्यांची निर्मिती आयुष मंत्रालयाचा परवाना घेऊन करण्यात आली आहे. आज काही लोक याबद्दल संभ्रम निर्माण करू पाहत आहेत. कुठल्याही औषधांची चाचणी आयुर्वेद करत नाही, संशोधकांनी ठरवून दिलेल्या मापदंडावर आम्ही काम करत आहोत.
गिलोय आणि अश्वगंधा विकली जात आहे
रामदेव बाबा म्हणाले, "आम्ही कोरोनिल आणि श्वासारी हे औषध पारंपारीक दृष्ट्या विकसित केले आहे. काही लोक गिलोय आणि अश्वगंधाच्या पुड्या दणक्यात कोरोना औषध म्हणून विकत आहेत. ते सेवन करण्याचे एक प्रमाण आहे. जे लोक आम्हाला विचारतात कि, आम्ही संशोधन कसे केले तर संशोधनाचा मुद्दा वेगळा आहे."