नवी दिल्ली : परदेशातून आपल्या नागरिकांना समुद्रमार्गे भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देत समुद्र सेतू अभियानाअंतर्गत तिसऱ्या मोहिमेसाठी भारतीय नौदलाचे जलाश्व हे जहाज ४ जून रोजी मालदीवमधील माले येथे पोहचले होते. ५ जून रोजी ७०० भारतीय नागरिकांना घेऊन हे जहाज काल सायंकाळी उशिरा भारताच्या दिशेने रवाना झाले. भारताकडे प्रस्थान करण्यापूर्वी मालदीव तटरक्षक दलाचे कमांडंट कर्नल मोहम्मद सलीम यांनी या जहाजाला भेट दिली.
या फेरीबरोबरच केंद्र सरकारच्या मिशन वंदे भारतच्या व्यापक मोहिमेंतर्गत जलाश्व मालदीव आणि श्रीलंका मधील सुमारे २७०० भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या भारतीय किना-यावर परत आणेल. या जहाजावर कोरोना संदर्भात सर्व प्रोटोकॉलचे कठोर पालन केले जाईल. हे जहाज ७ जून रोजी तूतीकोरिनला पोहोचणे अपेक्षित आहे. सुखरूप आलेल्या नागरिकांना तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथे उतरवण्यात येईल आणि राज्य प्रशासनाच्या देखरेखीखाली सोपविण्यात येईल.