राज्यसभेत भाजपचे बलाबल वाढले
गांधीनगर : गुजरातमध्ये १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणूकांपूर्वीच काँग्रेसला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला एक-एक करत धक्का सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत एकूण आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. भाजपतर्फे रमीलोबन बारा, अभय भारद्वाज, नरहरी अमीन यांच्यासह तीन उमेद्वार राज्यसभेसाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने भरतसिह सोलंकी यांना तिकीट दिले आहे.
यापूर्वी मार्चमध्ये काँग्रेसचे पाच आमदार प्रवीण मारू, मंगल गावित, सोमाभाई पटेल, जेवी काकडीया आणि प्रद्युम्न जडेजा आदींनी राजीनामा दिला होता. गुरुवारी दोन आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला. शुक्रवारी आणखी एक आमदार बृजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेतृत्वावर असलेल्या अविश्वासाचे हे कारण असल्याचे राजकीय चर्चा रंगत आहे. मार्चमध्ये काँग्रेस गुजरातला गळती लागली तेव्हा काही आमदारांना राजस्थान येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान मध्यप्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर कमलनाथ सरकार गडगडले होते.
राज्यसभेवर राज्यातील चार जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे. भाजपचे तीन आणि काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे. आकडेवारीनुसार केवळ दोन जागांवर भाजपला विजय मिळणार होता. मात्र, आत्तापर्यंत आठ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे एकूण तीन जागा भाजपला राखता येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप आमदारांना कोरोना
या निवडणूकीत सोशल डिस्टंसिंग ठेवणे गरजेचे आहे. भाजपचे तीन आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यासाठी निवडणूकीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. प्रॉक्सी वोटींगची मागणीही केली जाऊ शकते. दरम्यान, एक दिवस आधी तशी मागणी करावी लागणार आहे.
पक्ष जागा
भाजप १०३
काँग्रेस ६५ (एकूण ७३ - राजीनामा दिलेले आमदार ८)
बीटीपी २
राष्ट्रवादी १
अपक्ष १
रिक्त जागा ९
निवडणूक रद्द १
एकूण १८२