नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता संपत आला आहे. त्यामुळे ३१ जुलैनंतर काय सुरु होणार तसेच काय बंद राहणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, देशातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी काही काळासाठी हा लॉकडाउन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास १५ जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोनामुळे देशात अद्यापही लॉकडाउन कायम असून विमान वाहतूकसेवा बंद ठेवण्यात आली आहे. आता, या विमानसेवा बंदमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणखी काही काळ बंदच राहणार आहे. केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक जारी केले असून देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला १५ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ३० मे रोजी सरकारने जारी केलेल्या आदेशाची यापुढेही अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार १५जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी नाकारण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. फक्त सरकारने परवानगी दिलेल्याच विमानांच्या मार्गांवरील सेवा सुरु राहिल. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.