द्वेषावर चालवलेली द्वेषविरोधी आंदोलने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020   
Total Views |


Mahatma gandhi_1 &nb

वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद अशाप्रकारच्या भेदांविरुद्ध चाललेल्या आंदोलनाचे उद्धिष्ट समानता प्रस्थापित करण्याचे असले पाहिजे. इतिहासात या चळवळींचा उदय समता प्रस्थापित करण्यासाठीच झाला होता. मग ते अमेरिकेतील मताधिकारासाठी झालेले स्त्रियांचे आंदोलन असो अथवा आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचे आंदोलन.



अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनात महात्मा गांधींच्या पुतळ्याची सलग दोनदा विटंबना झाली आहे. विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्यालादेखील वर्णद्वेषाविरुद्ध चालवलेल्या या कथित आंदोलकांनी लक्ष्य केले. कोलंबस, राणी व्हिक्टोरियाचा पुतळादेखील आंदोलकांच्या विटंबना कार्यक्रमातून सुटला नाही. आंदोलकांच्या दृष्टीने ज्यांचे पुतळे उभारले गेले, तो प्रत्येकजण वर्णद्वेष्टा आहे. महापुरुषांनी इतिहासात घेतलेल्या भूमिकांना आजच्या परिप्रेक्ष्यात आपल्या चळवळीविरोधात दाखवून हे उद्योग करवून घेतले जातात. महात्मा गांधींच्या पुतळ्यासंदर्भाने अमेरिकेने भारताची माफी मागितली. ‘Black Lives Matters' या आंदोलनातील पुतळा विटंबना कार्यक्रमात गांधींच्या पुतळ्याला करण्यात आलेली हानी लक्षवेधी ठरली होती. त्याचे एक कारण म्हणजे गांधींच्या आयुष्यातील दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन. तसेच मार्टिन ल्युथर ते नेल्सन मंडेला या वर्णद्वेषाविरोधात लढणार्‍या मोठ्या असामींनी गांधीजींचा आदर्श म्हणून केलेला उल्लेख. तरीही सध्या सुरू असलेले हे वर्णभेदाविरोधातील आंदोलन यापैकी काहीच मान्य करायला तयार नाही. त्याउलट प्रत्येकाला ‘वर्णद्वेष्टा’ सिद्ध करण्यात या आंदोलनाला अधिक रस आहे. एकंदर या आंदोलनाची दिशा आणि आजवर आंदोलनाच्या नावाखाली झालेले उद्योग लक्षात घेतले, तर यातून साध्य काय करायचे आहे, ते आपल्या लक्षात येईल.
 

वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद अशाप्रकारच्या भेदांविरुद्ध चाललेल्या आंदोलनाचे उद्धिष्ट समानता प्रस्थापित करण्याचे असले पाहिजे. इतिहासात या चळवळींचा उदय समता प्रस्थापित करण्यासाठीच झाला होता. मग ते अमेरिकेतील मताधिकारासाठी झालेले स्त्रियांचे आंदोलन असो अथवा आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचे आंदोलन. या चळवळींना ठराविक उद्देश होते. त्याउलट आज सुरू असलेली आंदोलने या भेदभावाच्या मानसिकतेविरोधात चालवलेली आंदोलने आहेत, असा आंदोलकांचा दावा असतो. त्यातून मानसिकता बदलण्यासाठी कोणतेही रचनात्मक कार्यक्रम हे आंदोलक देऊ शकत नाहीत. अशा कथित समतावादी चळवळींचे नेतृत्व करणार्‍यांना रचनात्मक कार्यक्रमातून परिवर्तन, सलोखा याविषयी उत्तरे शोधण्यात रस नसतो. त्याउलट सगळं जग कस आपल्या विरोधात आहे, हेच आपल्या अनुयायांना दाखवून द्यायचे असते. चळवळीतील कार्यकर्ते विध्वंसक कृती-कार्यक्रमांना अधिक पसंती देऊ लागतात. हे सर्व होत असताना समतेसाठी चालवलेल्या लढ्याच्या इतिहासातील सौंदर्यस्थळे अडसर ठरू लागतात. कारण, काहीतरी सकारात्मक घडू शकते, कधीकाळी घडले आहे, हे द्वेषावर चालणार्‍या कथित द्वेषविरोधी चळवळींना जाणून घेण्याची इच्छा नसते. कारण, सकारात्मक काहीतरी घडवायचे म्हणजे जबाबदारीचा प्रश्न येतो. त्याऐवजी नकारात्मकता दाखवून विद्ध्वंस सुरू ठेवणे सोपे जाते. १३ डिसेंबर २०१८ रोजी घाणा विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेला गांधींचा पुतळा याच मानसिकतेने हटविण्यात आला होता. गांधीजींच्या आयुष्यातील काही वक्तव्यांचा विपर्यास करून गांधीदेखील वर्णवादी होते, असे दाखविण्याचा प्रयत्न या चळवळीने यशस्वीपणे केला आहे. नताल संसदेला लिहिलेल्या पत्रात गांधींनी केलेल्या विधानाचा संदर्भ दिला जातो. मुख्य म्हणजे, गुलाम वाहेद व अश्विन देसाई या दोघांनी लिहिलेले ‘साऊथ आफ्रिकन गांधी’ हे पुस्तक याला कारणीभूत ठरले. अमेरिकेतील आंदोलनात गांधींच्या पुतळ्यांची विटंबना होण्यास हीच वैचारिक मांडणी कारणीभूत ठरलेली दिसते.
  
भारतातही असे प्रकार कथित समतावादी चळवळींमार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही विशिष्ट प्रतीके उभी करून त्याआडून द्वेषाने पछाडलेल्या टोळ्या तयार करणे हाच यांचा उद्देश. जसे टिळकांची वेदोक्त प्रकरणातील भूमिका दाखवताना बर्वे प्रकरणाचा संदर्भ द्यायचा नाही. गोळवलकर गुरुजींच्या ‘चातुर्वर्ण्य’ या मुलाखतीची तोडमोड करून वैचारिक मांडणी करायची. १९३९ सालच्या लेखनातील एका वाक्याचा संदर्भ घेऊन गोळवलकर गुरुजींना ‘हिटलर समर्थक’ ठरवायचे. इतिहासात लिहिल्या गेलेल्या एखाद्या वाक्याचा, विधानाचा संदर्भ देऊन असे युक्तिवाद उभारले जातात. सगळेच आपल्या विरोधात होते, आहेत व भविष्यातही असणार आहेत, हेच कायमस्वरूपी मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरंतर समतेसाठी चाललेल्या आंदोलनांसमोर द्वेषाचे निर्मूलन करणे हा उद्देश असला पाहिजे. पण, त्याउलट या आंदोलनांना द्वेषाचेच इंधन झाले आहे की काय, असा प्रश्न पडतो.

 
@@AUTHORINFO_V1@@