मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार अनेक पर्याय अवलंबत आहेत. तरीही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्यासह मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर अशा चार महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका करत “तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी” असे ट्विट करत चिमटा काढला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी गोंडवाना विद्यापीठाची एक अधिसूचना ट्विटरवरून शेअर करत सांगितले की, “उच्च शिक्षण मंत्री महोदय, हा पहा तुमच्या निर्णयानंतरचा सावळागोंधळ! अजून सूत्र ठरले नाही, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा अद्याप निर्णय नाही आणि गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडे लेखी मागायला सुरुवात केली. जेमतेम आठ दिवसात लेखी देण्याची सक्ती? विद्यार्थ्यांचा छळ सुरु आहे.” अशी टीका त्यांनी केली.
“शेतकरी हवालदिल, विद्यार्थी अधांतरी, रोजच्या रोज नवी अदलाबदली, आधी घोषणा..मग निर्णय…मग गृहपाठ… इथंच सगळी मेख, ११ विद्यापीठांच कसे ठरणार सूत्र एक? आता हाच एक सगळ्यात मोठा पेच!, तीन कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार…लय भारी!” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला.