पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘मिशन झिरो’ला दाखविला हिरवा झेंडा!
मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. हीच साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिका आता 'मिशन झिरो' ही संकल्पना राबवणार आहे. मुंबईतील सहा विभागांमध्ये ‘मिशन झिरो’ राबवण्यात येणार आहे. बोरिवली(आर मध्य), दहिसर(आर उत्तर), मालाड(पी उत्तर), कांदिवली(आर दक्षिण) भांडुप( एस विभाग), मुलुंड( टी विभाग) मधली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेचा नवा ‘मिशन झिरो प्लॅन’ असणार आहे.
मुंबई महापालिकेकडून अंधेरीतील शिवाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये ‘मिशन झिरो रॅपिड अॅक्शन प्लॅन’चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘मिशन झिरो’ला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. मिशन रॅपिड अॅक्शन प्लॅनचे लॉन्चिंग केल्यानंतर महापालिकेकडून ५० मोबाईल डिस्पेंन्सरी व्हॅनचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला आहे. या मोबाईल व्हॅन मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहीसर आणि कांदिवली येथे २-३ आठवडे रुग्णांच्या सेवेसाठी दाखल असणार आहेत.
या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना, क्रेडाई -एमसीएचआय, देश अपनाये, बिल गेटस् फाऊंडेशन या संस्थांची मदत होणार आहे. ‘मिशन झिरो’ या संकल्पनेमुळे मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होवू शकणार आहे.