नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५-१६ जून रोजी मध्यरात्री झालेल्या संघर्षात. भारतीय लष्करातील २० जवान शहिद झाले. त्यानंतर भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर भारत आणि चीनमध्ये बोलणी सुरूच आहे.भारताने देखील आपल्या निर्णयावर ठाम राहत चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आल्याचे सांगितले. या घटनेनंतर चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.
लडाखमधील सीमावर्ती गावांमधून ग्रामस्थांना बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली आहे. दैनिक भास्करच्या एका वृत्तानुसार, सैन्याने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना हे गाव रिकामे करण्यास सांगितले आहे. डेमचॉक आणि पांगोंग त्सो तलावाच्या आसपासच्या वस्तींना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सीमेजवळील भागात मोबाइल फोन बंद करण्यात आले आहेत. लष्कराचे लँडलाईन फोनसुद्धा बंद केले गेले आहेत. भारतीय लष्कराने लडाखमध्ये जवानांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच, सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद केली असून लोकांसाठी श्रीनगर लेह- महामार्ग बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, हवाई दल आणि नौदलाचे जवान सुद्धा हाय अलर्टवर आहेत. चीनने सुद्धा सीमेवर आपल्या सैनिकांची तैनात वाढली आहे. भारत-चीन सीमेवरील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे.
मंगळवारी रात्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तीन सैन्य प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत नौदलाला चीनला लागून असलेल्या भागात युद्धनौका तैनात करण्याचे आदेशही प्राप्त झाले आहेत. सैन्याव्यतिरिक्त चीनच्या सीमेवर तैनात आयटीबीपीनेही आपल्या सैन्यास सतर्क केले आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमधील हवाई तळावर लढाऊ विमान तैनात करण्यात येत आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारताच्या सीमा व्यवस्थापनासाठी शांतता राखण्याचे धोरण बदलले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्याचवेळी, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)कडे परत जाण्याचे पर्याय देखील संपले आहे. भारतीय सैन्य सध्या ३४८८ कि.मी. एल.एल.सी. आणि पूर्वेकडील सर्वोच्च स्थानावर तैनात आहे. चीनने एल.ए.सी. वर विशेषतः गलवान, बेग ओल्डि, देपासंग, चुशुल आणि पूर्व लडाखच्या इतर भागातही आपली सैन्यबळ वाढवले आहे. यावरून असे दिसते आहे की भारतीय सैन्य युद्धासाठी सज्ज आहे. लद्दाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत एलएसीवर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवरील १५ हजार सैन्य तैनात आहे.