ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुस-या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, "आत्मनिर्भर भारता" साठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकाच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार. अॅड आशिष शेलार यांनी आज ठाणे येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका भाजप गटनेते संजय वाघुले आदी उपस्थित होते.
आमदार शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे.
या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेले देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणारे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देवून जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.
ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यावधी लोकांना मोफत धान्य, शेतक-यांना खात्यात थेट पैसे जमा करणे. गरीब कुटुंबाना मोफत गॅससिलेंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा वदिव्यांगाना थेट आर्थीक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.
त्यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करुन देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. यामध्ये शेतक-यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या फायदेशीर सुधारणेसह अनेक महत्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघुउद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देवून अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.
ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकावर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करुन बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानामधील पिडीत धार्मिक, अल्पसंख्याकांना भारताची नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दिर्घकाळ प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक केली आहे.