मुंबई : शताब्दी रुग्णालयात रुग्ण विठ्ठल मुळये (८०) यांचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकावर आढळल्या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबईत अशा अनेक घटना घडल्या परंतु एकाही ठिकाणी पालकमंत्री आदित्य ठाकरे पोहोचले नाहीत,
मुंबईकर त्यांना शोधतायत, सापडले तर आम्हालाही सांगा, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे. कर्तव्य म्हणून मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे कुठेही पोहोचले नसल्याची टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नगर, आप्पापाडा कुरार व्हिलेज, मालाड येथे राहणारे विठ्ठल रघुनाथ मुळये यांचा मृतदेह बोरिवली स्थानकात आढळला होता. हा संपूर्ण प्रकार म्हणजे पालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीतूनही मुळये बाहेर जाताना दिसले नाहीत. खासगी रुग्णालयात टेस्ट आणि उपचार घेऊन ते इथे दाखल झाले होते. त्यामुळे पुन्हा स्वतःहून बाहेर पडतील, अशी शक्यता नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलीसांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.